Wednesday, April 27, 2011

पांडेश्वर

सासवड पासून २६ किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे, महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते 'पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात' अशी लोकधारणा आहे.

या मंदिराला गौरवशाली वारसा आहे मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर, दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.

Monday, April 25, 2011

सासवडकर संकेतस्थळावर नवीन

कानिफनाथ मंदिर

नाथ पंथामधील कानिफनाथ यांचे मंदिर सासवड पासून १५ किलो मीटर अंतरावर सासवडच्या पश्चिमेकडे बापदेव घाट मार्गावर आहे. बोपगाव पासुन उजवीकडे मंदिराची कमान लागते वेडी वाकडी वळणे घेत घाटरस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे.

थोड्या पायर्‍या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो, पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे. मुळचे मंदिर लहान आहे, मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकी वजा १ फुट बाय १ फुटाची चौकट आहे, या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते. आतमध्ये पंधरा वीस जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे. अधिक वाचा http://www.saswadkar.com/dharmik/kanifnath.html

कानिफनाथ, नारायणेश्वर महादेव व दत्तात्रय मंदिर तसेच पांडेश्वर मंदिराबद्दल अधिक माहितीसाठी अवश्य भेट द्या http://www.saswadkar.com/dharmik.html

सासवड विषयी थोडक्यात

कर्‍हेपठारावर १८०० - २१० उत्तर रेखांश व ७४० - १० पर्व अक्षांवर सासवड वसलेले आहे. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने या भूमीत गहन तप केले. ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पुनीत झाली म्हणून तीस ब्रह्मपुरी म्हणत.

फार पूर्वी येथे सहा वाड्या (वस्त्या) होत्या.
वटेश्वरापाशी ‘वरखेडवाडी’, सिद्धेश्वरपाशी ‘सरडी’, सदतेहे बोरीचे पटांगण, ‘संवत्सर गांव’ सोपानदेवापाशी, ‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदीरापाशी, जुन्या भैरवनाथाजवळ ‘सनवडी’. कालमानाने या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवडनामे गावात रुपांतर झाले. या सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असाही एक तर्क आहे.

फार प्राचीन काळी या ठिकाणी सात विशाल वड होते, या सात वडांवरून हे गाव सातवड असे ओळखले जाई. कालांतराने सातवडचा उच्चार सासवड बनला असावा, असाही एक समज आहे.

शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांचे हे जाहागिरीतील गाव. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरु पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करुन लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.